मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाला,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी २३ मे रोजी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले.
दानवे म्हणाले, ‘२०१४च्या निवडणुकीत जनतेसमोर मोदींचे नाव होते व त्यांच्याकडून अपेक्षा होती. या निवडणुकीत जनतेसमोर मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम आणि त्यांचे जागतिक पातळीवर प्रस्थापित झालेले नेतृत्व होते व त्यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट झाली. बूथस्तरापर्यंत पक्षाची प्रभावी रचना झाली. त्यामुळे पक्षाला विजय मिळाला. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे काम आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे काम जनतेला पसंत पडले आहे. त्यासोबत भाजपची पक्ष संघटना अधिक बळकट झाली आहे. गेली पाच वर्षे भाजप सातत्याने सर्व निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीतही राज्यात भाजपने जिंकलेल्या जागा व मिळालेली मते या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला.’
‘भाजप–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया–राष्ट्रीय समाज पक्ष–शिवसंग्राम–रयत क्रांती संघटना यांच्या महायुतीने राज्यात एकजुटीने काम केले, त्यामुळे महायुतीला राज्यात जबरदस्त यश मिळाले आहे. आपण भाजपतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार मानतो. ‘रिपाई’चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या निवडणुकीत महायुतीसाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या व त्याचा लाभ झाला,’ असे दानवे यांनी नमूद केले.
‘निवडणुकीतील जनतेचा आशीर्वाद भाजप नम्रपणे स्वीकारत आहे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नव्या जोमाने काम करेल,’ असे त्यांनी सांगितले.